पुणे,दि.24-: शेतकरी जगला की शेतमजूर जगेल, शेतमजूर जगला की
बारा बलुतेदार जगतील, बारा बलुतेदार
जगले की ग्रामीण अर्थव्यवस्था उभी राहते. यासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या सर्वांगिण विकास आणि
उन्नतीसाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली असून
त्याद्वारे शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मानव
संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज येथे केले.
लागवडीलायक धारण क्षेत्र दोन हेक्टरपर्यत असलेल्या अल्पभूधारक शेतकरी
कुटुबियांना दोन हजार रुपये प्रती हप्ता याप्रमाणे तीन हप्त्यात सहा हजार रुपयांची
मदत देणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा शुभारंभ केंद्रीय मानव
संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याहस्ते मध्यवर्ती सहकारी बँकेच्या
यशवंतराव चव्हाण सभागृहात झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महसूल मंत्री
चंद्रकांत पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, कृषी व फलोत्पादन सचिव एकनाथ
डवले, विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर, कृषी आयुक्त् सुहास दिवसे, जिल्हाधिकारी
नवल किशोर राम, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे उपस्थित होत्या.
यावेळी श्री.जावडेकर म्हणाले, शेतजमीन मृदा आरोग्य पत्रिका, शेतकऱ्यांना
निम कोटींगनेयुक्त युरियाचा पुरवठा, सहकारी बँकांच्या माध्यमातून शेतीसाठी मुबलक कर्ज
पुरवठा, शेतमालाला किफायतशीर भाव, शेतीसाठी पूरेसा पाणी पुरवठा तसेच प्रधानमंत्री पीक
विमा योजना, केंद्र व राज्य शासन शेतकऱ्यांसाठी राबवित असलेल्या विविध विकास योजनांमुळे
शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ होणार असून तो कर्जबाजारी होणार नाही. त्यामुळे
भविष्यात शेतकऱ्याला कर्जमाफीची गरजच पडणार नाही. स्वातंत्र्योत्तर काळातील
शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठीची ही सर्वात मोठी योजना असल्याचेही त्यांनी सांगितले.
महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, छोटया शेतकऱ्यांच्या गरजा
पूर्ण करणारी ही योजना असून, महाराष्ट्रातील सुमारे एकोणसत्तर लाख अल्पभूधारक
शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात 70 लाख शेतकऱ्यांच्या बँक
खात्यात दोन हजार रुपये जमा होणार आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना तीन हप्त्यामध्ये एकूण 4 हजार 200 कोटी रुपयांचा
लाभ मिळेल अशी माहिती त्यांनी दिली. योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तर, जिल्हास्तर, तालुकास्तर व
ग्रामस्तरावर संनियंत्रण समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.
कृषी व फलोत्पादन सचिव एकनाथ डवले यांनी प्रास्ताविकात योजनेची माहिती दिली. तलाठी यांच्या
मदतीने लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात येणार असून, ग्रामसेवक व कृषी सहायक
याकामी सहकार्य करणार आहेत. योजना सुटसुटीत असून यासाठी, आधार क्रमांक व बँक खाते
क्रमांक आवश्यक असल्याचे सांगितले. मानव संसाधन मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याहस्ते
यावेळी प्रतिनिधीक स्वरुपात चौदा लाभार्थी शेतकऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार
करण्यात आला. कार्यक्रमाला शेतकरी, कृषी क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी मोठया संख्येने
उपस्थित होते.
000