13 कोटी वृक्ष लागवड
उपक्रमातून निसर्गाच्या संवर्धनाबरोबरच
मानवी मुल्यांचे
संर्वधन होईल
- पालकमंत्री गिरीश बापट
पुणे दि. 1- समृद्ध निसर्ग समाजाला ऊर्जा
देतो, त्यामुळे 13 कोटी वृक्ष लागवड या सारख्या उपक्रमातून निसर्गाच्या संवर्धना बरोबरच
मानवी मुल्यांचे संवर्धन देखील होणार आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश
बापट यांनी केले.
भांबुर्डा वन
उद्यान येथील 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त
डॉ. दिपक म्हैसेकर, अपर जिल्हाधिकारी रमेश काळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
सुरज मांढरे, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक जीतसिंग, उपवनसंरक्षक श्रीलक्ष्मी ए, आमदार
विजय काळे, नगरसेवक आदित्य माळवे, मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, वनसंरक्षक सर्व श्री.
कुलकर्णी, वानखेडे, सत्यजित गूजर आदी उपस्थित होते.
पालकमंत्री बापट म्हणाले, आजच्या परिस्थितीत होणारी निसर्गाची
हानी थांबवण्यासाठी वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. मनुष्य स्वभावाप्रमाणे आपण नेहमीच
प्रत्येक कामाच्या मोबदल्याची अपेक्षा करत असतो. वृक्षारोपण केल्याने मात्र आपल्याला
लगेच मोबदला मिळणार नसला तरी ती भविष्यासाठीची तरतूद आणि आपण पुढील पिढीसाठी निर्माण
केलेली संपत्ती आहे याची जाणीव ठेवावी. एखादी चांगली कृती करण्यासाठी समाजाची साथ असणे
आवश्यक आहे. आज या कार्यक्रमात आपण वृक्षारोपणाची आणि वृक्षसंवर्धनाची शपथ घेऊ पण त्याची
अंमलबजावणी होणे महत्त्वाचे आहे. वृक्षारोपणांसोबतच त्या वृक्षाचे दायित्व घेऊन वृक्ष
वाढवणे आणि संवर्धन होण्यासाठी ही प्रयत्न करायला हवेत. वृक्षारोपण ही फक्त वन विभागाची
जबाबदारी नसून ती सगळ्यांची जबाबदारी आणि कर्तव्य आहे. वृक्षारोपन केल्यानंतर ते जगवण्यासाठी
पाणी असणे देखील गरजेचे आहे, त्यामुळे पाण्याची बचत करण्यावर देखील आपण लक्षकेंद्रीत
केले पाहिजे. आरोग्य सेवांच्या प्रगतीमुळे आज सरासरी आयुष्यमान वाढले आहे. पण आरोग्य
चांगले राहण्यासाठी पर्यावरण जपणे देखील महत्त्वाचे आहे. नैसर्गिक संपत्तीची योग्य
ती काळची न घेता आपण निसर्गाचा ऱ्हास करतो आणि निर्सगाशीच भांडण करतो असे न करता निसर्ग
आपला मार्गदर्शक असतो याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी, असे देखील श्री. बापट यांनी यावेळी
सांगितले.
विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, पावसाच्या वेळेत झालेला
बदल हा आपल्याला कित्येक वर्ष जाणवतो आहे. याचे मुख्य कारण म्हणजे निसर्गाची होणारी
हानी आहे. पुणे विभागाला दिलेल्या एकूण 55 लाख उद्दिष्टा पेक्षा अधिक वृक्षारोपण होईल
आणि जीओ टॅपिंगच्या माध्यमातून त्या वृक्षांचे संवर्धन देखील होईल. नदी काठावर देखील
मोठ्या प्रमाणात या वर्षी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. सर्वच शासकीय कार्यालयामध्ये
होणारा कागदाचा वापर टाळावा, कारण हा कागद झाडांपासून तयार होतो. त्यामुळे कागदाचा नाहक वापर केल्याने आपण अप्रत्यक्षरित्य
निसर्गाचा ऱ्हास करत असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
मुख्य कार्यकारी
अधिकारी सूरज मांढरे म्हणाले, अनेकवेळा शाळेत निसर्गावर निबंध लिहिले जातात, त्यात
निसर्गाचा ऱ्हास झाल्याचे तोटे देखील लिहिलेले असतात. पण या निबंधाचा रोजच्या जगण्यात
उपयोग होणे आवश्यक आहे. दिल्लीमध्ये निर्माण झालेली परिस्थिती, इतर ठिकाणी निर्माण
होऊ नये यासाठी वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. वृक्षलागवडी बाबत फक्त प्रबोधन न करता
कृती होणे गरजेचे आहे. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात करण्यात
येणार आहे. लागवड केलेल्या वृक्षाचे संवर्धन करण्यासाठी त्या वृक्षाचे संगोपन करण्याची
जबाबदारी एका कुटुंबावर देऊन त्यांना त्याचे मानधन देखील देण्यात येणार आहे. वृक्षारोपणास
भावनांची जोड देणे गरजचे आहे. एखाद्या आनंदी किंवा दुखाच्या प्रसंगाची आठवण म्हणून
लावलेल्या रोपाची काळजी घेतली जाते, असे देखील ते यावेळी म्हणाले.
वृक्षारोपणाठी
हुजूर पागा विद्यालय, रामचंद्र राठी विद्यालय, विशेष मुलांचे नवक्षितीज विद्यालय, तसेच
एन.सी.सी चे विद्यार्थी उपस्थित होते. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते त्यांच्या
प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. प्लॅस्टीक पिशवीचा वापर टाळण्यासाठी पुणे महापालिकेचे
नगरसेवक आदित्य माळवे हे कापडी पिशवीचे वितरण करणार आहेत. या पिशवीचे प्रातिनिधीक वाटप
श्री. बापट यांच्या हस्ते झाले.
विद्यार्थी,
ज्येष्ठ नागरिक, तसेच महिलांनी व महाविद्यालयीन युवक युवतींनी वृक्षारोपन केले. तसेच
मान्यवर व उपस्थितांनी वृक्षारोपणाची शपथ देखील घेतली.
कार्यक्रमाचे
प्रास्ताविक मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर यांनी केले तसेच सुत्रसंचालन विभागीय वन
अधिकारी रमाकांत बोराडे यांनी केले.
●
13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाचा
मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ ●
पालकमंत्री गिरीश
बापट, विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, अपर जिल्हाधिकारी रमेश काळे, जिल्हा परिषदेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक जीतसिंग, उपवनसंरक्षक
श्रीलक्ष्मी ए, आमदार विजय काळे, नगरसेवक आदित्य माळवे, मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर,
वनसंरक्षक सर्व श्री. कुलकर्णी, वानखेडे, सत्यजित गूजर आदी उपस्थित मान्यवरांनी यावेळी वृक्षारोपण करून 1 जुलै ते 31 जुलै या कालावधीत
होणाऱ्या 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाचा शुभारंभ केला .
00000