सुदृढ लोकशाहीसाठी पारदर्शी आणि जबाबदारीपूर्ण काम व्हावे
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू
पुणे दि. 21 (विमाका): पुणे शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला असून देशाची सांस्कृतिक राजधानी म्हणून या शहराची ओळख आहे.महानगरपालिकेने सुंदर सभागृह बांधले असून या सभागृहातून जनहिताचे चांगले निर्णय व्हावे आणि सामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न व्हावा.सुदृढ लोकशाहीसाठी पारदर्शी आणि जबाबदारीपूर्ण कामकाज व्हावे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केले.
पुणे महानगरपालिकेच्या नवीन विस्तारीत इमारतीचे उद्घाटन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. कार्यक्रमास केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार अनिल शिरोळे, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर सिध्दार्थ धेंडे, स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले,मनपा आयुक्त सौरभ राव आदि उपस्थित होते.
आपण अनेक ठिकाणी जावून आलो पण असे सुंदर आणि देखणे सभागृह कुठेही पाहायला मिळाले नाही, असे गौरवोद्गार काढून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू पुढे म्हणाले, या शहराविषयी नेहमीच मनात आदर व आकर्षण राहिले आहे. या शहराने देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात अमुल्य योगदान दिले आहे. मुंबईनंतर देशात पुण्याची ओळख आहे. झपाट्याने विकसित होणाऱ्या या पुणे शहराने केंद्र व राज्यशासनाच्या विविध योजनांचा लाभ घेवून स्वच्छ, सुंदर आणि हिरवेगार शहर निर्माण करावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
पुणे शहराचा स्मार्टसिटी योजनेत समावेश झाला आहे. यातील सर्व योजनांच्या कामात पारदर्शीपणा आणि उत्तरदायित्व जोपासले जावे.नागरिकांना कालचे पुणे, आजचे पुणे आणि उद्याचे पुणे याबाबत समजावून सांगितल्यास त्यांचाही सहभाग याकामी लाभू शकतो. नागरिकांना प्राथमिक गरजा उपलब्ध करुन देतांनाच ऑनलाईन सुविधा पुरविण्याच्या प्रयत्न केला जावा. रस्ते तसेच नद्यांवरील अतिक्रमणे दूर व्हावीत, नद्यांमध्ये सांडपाणी सोडले जावू नये. यासाठी जनजागृती करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
शारीरिक श्रम नसल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होत असल्याचे नमूद करुन त्यांनी सायकल ट्रॅक्सची आवश्यकता प्रतिपादन केली. आरोग्य हीच संपत्ती या उक्तीचा उल्लेख करुन ते म्हणाले, धनसंपत्ती असूनही मधूमेह, हायपर टेन्सन या सारखे रोग असतील तर त्या संपत्तीचा काय उपयोग ?महापालिकेने नागरिंकाच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी आपल्या प्रमुख भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, उपराष्ट्रपती या कार्यक्रमासाठी आले, याबद्दल राज्याचे प्रमुख या नात्याने त्यांचे अभिनंदन करतो आणि आभार मानतो. पुणे महानगरपालिकेने सुंदर आणि देखणे सभागृह बांधले आहे. या सभागृहाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव दिल्याने अधिक महत्व वाढले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकारभार चालवताना नेहमीच रयतेचा विचार केला. सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून सर्व घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांचे विचार व आचार अंमलांत आणून या सभागृहातून कामकाज चालावे, अशी अपेक्षा व्यक्त करुन मुख्यमंत्री पुढे म्हणाले, पुणे हे ऐतिहासिक शहर आहे. या शहराला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेला आहे. त्यांच्या कार्याने ही भूमी पुनित झालेली आहे.
सांस्कृतिक बरोबरच ज्ञाननगरी म्हणून पुण्याचा देशभर नावलौकिक आहे. 21 व्या शतकात मुंबईनंतर पुणे हे विकासाचे इंजिन म्हणून काम करणार असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, पुणे हे आंतरराष्ट्रीय शहर व्हावे, यासाठी विविध विकासाची कामे आपण राबवित आहोत. पुणे महामेट्रो,रिंगरोड हे विकासाचे मॉडेल ठरणार आहे. पुणे येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ होऊ घातले असून पुणे शहरातून वाहणाऱ्या मुळा व मुठा या नदीचे पुनर्जीवन करण्याचे काम हाती घेतले आहे. याशिवाय स्वारगेट येथे ट्रान्सपोर्ट हब होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे स्मार्ट सिटीचे उद्घाटन झाले होते. त्यांच्या स्वप्नातले हे शहर आदर्श, सुंदर व देखणे होण्यासाठी राज्यशासनाचे पाठबळ असणार आहे.
पुण्याचा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा यापुढेही अधिक जोमाने सुरु राहावा, यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन करुन मुख्यमंत्री पुढे म्हणाले, विकासासाठी सर्वांनी एकत्र येवून काम करावे. या सभागृहातून चांगले निर्णय व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, हे सभागृह देखणे झाले आहे. विकासासाठी सर्वांनी एकत्र येवून काम करावे.
यावेळी पालकमंत्री गिरीश बापट आपल्या मनोगतात म्हणाले, पुण्याचा डीपी मंजूर झाल्याने विकासाच्या वाटा मोकळ्या झाल्या. सामान्यांना केंद्रबिंदू मानून पुण्याचा विकास सुरु आहे. शहराच्या विकासासाठी कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी महापौर मुक्ता टिळक यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात पुणे शहराची ऐतिहासिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी स्पष्ट करतांना शहराने केलेल्या विकास कामाची व होऊ घातलेल्या विविध योजनांची माहिती दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हे शहर नावलौकिक मिळवेल, असा विश्वास व्यक्त केला.
ठळक वैशिष्ट्ये
· पुणे महानगरपालिकेचे सध्याचे क्षेत्रफळ सुमारे 250 चौ. कि.मी असून नव्याने समाविष्ट 11 गावांसहीत क्षेत्र सुमारे 331 चौ. किमी. इतके झाले आहे. सध्याची लोकसंख्या सुमारे 40 लक्ष इतकी असून 167 नगरसेवक आहेत. वाढत्या लोकसंख्येचा कारभार त्या त्या भागातून चालण्याच्या दृष्टीने क्षेत्रिय स्तरावरील 15 क्षेत्रिय कार्यालये कार्यरत आहेत.
· पुणे मनपाचा वाढलेला विस्तार विचारात घेऊन अस्तित्वातील इमारतीच्या दक्षिण बाजूस चौरस आकारात एका नवीन विस्तारीत इमारतीचे दुमजली बेसमेंट पार्किंग अधिक चार मजले अशा स्वरूपाचे इमारतीचे बांधकाम पूर्ण केले असून वापरासाठी एकूण सुमारे अंदाजे 14 हजार चौ.मी. क्षेत्र उपलब्ध झाले आहे.
· या मध्ये तळमजल्यावर सर्व विभागांसाठी एकत्रित असे नागरिक सुविधा केंद्र, एक खिडकी योजना कक्ष, पोस्ट ऑफिस, बँक ए.टी.एम,पीएमपीएमएल पास केंद्र इ. सुविधा करण्यात आल्या आहेत.
· पहिल्या मजल्यावर विविध पक्ष कार्यालये व नगरसचिव कार्यालय करण्यात आली आहेत. दुस-या मजल्यावर सभागृह नेता, स्थायी समिती अध्यक्ष, उपमहापौर, विरोधी पक्षनेता व विविध समिती अध्यक्ष यांची दालने तसेच स्थायी समिती सभागृह इतर समिती सभागृह, पत्रकार कक्ष व विविध पक्ष पदाधिकारी कार्यालय बांधण्यात आली आहेत.
· तिस-या मजल्यावर 72 फूट व्यासाचे घुमटाकार मुख्य सभागृहाचे व महापौर दालनाचे बांधकाम करण्यात आले आहे. मुख्य सभागृहाचे व महापौर दालनाचे बांधकाम करण्यात आले आहे. मुख्य सभागृहासाठी, लोखंडी फ्रेम व जी.आर.सी. (ग्लास रिनर्फोर्स्ड कॉन्क्रीट) मटेरियलचा गोलाकार घुमट करण्यात आला असून घुमटाची उंची तळापासून सुमारे 60 फूट इतकी आहे. नवीन सभागृहामध्ये 224 सभासदांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रेक्षक गॅलरीमध्ये 180 नागरिकांकरीता आसन व्यवस्था केलेली आहे. महापौर यांच्या डायसच्या मागील बाजूस 50 अधिकारी व त्या मजल्यावर सुमारे 50 पत्रकारांसाठी कक्षाची रचना केली आहे.
· इमारतीसाठी अद्ययावत वातानुकूलीत यंत्रणा, 6 उद्वाहने व वीजेची बचत होणारी एल.ई.डी दिव्यांची विद्युत व्यवस्था करण्यात आलेली आहे. या इमारतीचे बांधकाम हे पर्यावरण पुरक निकषांन्वये करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे सुसज्ज अग्निशमन यंत्रणा व फायर अलार्म सिस्टिम करण्यात आली आहे.
· आजपर्यंत या कामासाठी सुमारे 48.75 कोटी रुपये इतका खर्च झाला आहे. या इमारतीचे बांधकाम सुमारे सव्वातीन वर्षात पूर्ण करण्यात आले असून यामुळे पुणे महानगरपालिकेस नवीन सुसज्ज वास्तू उपलब्ध झाली आहे.
000000
No comments:
Post a Comment