Saturday, October 8, 2016

जलयुक्तमध्ये उत्कृष्ट योगदान देणाऱ्या पत्रकार पुरस्कारासाठी 30 ऑक्टोबर,2016 पूर्वी अर्ज सादर करावेत

जलयुक्तमध्ये उत्कृष्ट योगदान देणाऱ्या पत्रकार पुरस्कारासाठी
30 ऑक्टोबर,2016 पूर्वी अर्ज सादर करावेत
            पुणे, दि. 08- राज्यातील पाणी टंचाई कायमस्वरुपी दूर व्हावी यासाठी राज्य शासनाने जल युक्त शिवार अभियान हा महत्वाकांक्षी उपक्रम सुरु केला आहे. जलसंधारणाचे महत्व सर्वसामान्य जनतेपर्यत पोहचविणारे आणि जलयुक्त शिवार अभियानाची त्या त्या परिसरातील जनजागृती, अभियानात लोकसहभाग वाढविणे, पाण्याचा ताळेबंद व कार्यक्षम वापर, पाणलोटाच्या यशोगाथा प्रकाशित करणे, इतर गावांना प्रोत्साहित करुन पाणी प्रश्न सोडविण्यात योगदान देणाऱ्या पत्रकारांना, इलेक्टॉनिक्स माध्यमातील प्रतिनिधींना शासनातर्फे पुरस्कार देण्यात येणार आहे. जिल्हा, विभागीय व राज्य स्तरावर प्रत्येकी तीन पारितोषिके देण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरुप व अटी पुढीलप्रमाणे आहे.
                महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्कार या नावाने राज्यस्तर पुरस्कार देण्यात येणार असून प्रथम पुरस्कार रुपये पन्नास हजार, द्वितीय पुरस्कार रुपये पस्तीस हजार, तृतीय पुरस्कार रुपये पंचवीस हजार देण्यात येणार आहे.
                राजमाता जिजाऊ जलमित्र या नावाने विभागीयस्तर पुरस्कार देण्यात येणार असून प्रत्येक विभागामध्ये प्रथम पुरस्कार रुपये तीस हजार, द्वितीय पुरस्कार रुपये वीस हजार आणि तृतीय पुरस्कार रुपये पंधरा हजार देण्यात येणार आहे.
                पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार या नावाने जिल्हा पुरस्कार देण्यात येणार असून प्रथम पुरस्कार रुपये पंधरा हजार, द्वितीय पुरस्कार रुपये बारा हजार आणि तृतीय पुरस्कार रुपये दहा हजार देण्यात येणार आहे.
                इलेक्टॉनिक मिडीयामधील मराठी वृत्तकथा प्रसारित करणाऱ्यांना राज्यस्तरावर पुरस्कार देण्यात येणार आहे. यामध्ये प्रथम पुरस्कार रुपये एक लक्ष, द्वितीय पुरस्कार एकाहत्तर हजार व तृतीत पुरस्कार एकावन्न हजार आहे.
                जलयुक्त शिवार अभियानाच्या प्रसिध्दीसाठी बातमीदारांनी मोहिमेच्या अंमलबजावणीच्या प्रथम वर्षी 1 जानेवारी,2015 ते 31 डिसेंबर,2015 आणि त्यापुढे प्रतीवर्षी 1 जानेवारी ते पुढील वर्षातील 31 डिसेंबर या कालावधीत प्रसिध्द केलेले साहित्य पुरस्कारासाठी ग्राहय धरण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्यात प्रकाशित होणाऱ्या शासनमान्य मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषेतील दैनिके, साप्ताहिके व पाक्षिकातील लिखाणाचा विचार करण्यात येणार आहे. यासाठी राज्य, विभागीय आणि जिल्हास्तर पुरस्कार समिती स्थापण्यात आली आहे.
राज्यस्तर समितीचे संचालक, मृदसंधारण व पाणलोटक्षेत्र व्यवस्थापन हे सदस्यचिव आहेत. विभागीय समितीचे सदस्य सचिव संबधित विभागाचे उपसंचालक (माहिती) हे आहेत. जिल्हा समितीचे सदस्य सचिव संबधित‍ जिल्हयाचे जिल्हा माहिती अधिकारी आहेत. जिल्हा स्तर, विभागीय स्तर व राज्यस्तरावर या पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या पत्रकारांनी आपले अर्ज तीन प्रतीमध्ये विहीत नमुन्यात संबधित समितीचे सदस्य सचिव यांचेकडे सादर करणे आवश्यक आहे. पुणे जिल्हयातील पत्रकारांनी समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, तळ मजला, मध्यवर्ती इमारत, पुणे  (दूरध्वनी क्रमांक 26121168/26122302/26121307) येथे 30 ऑक्टोबर,2016 पूर्वी आपले अर्ज सादर करावे.
                सदरील पुरस्कार निवडीचे स्वरुप, नियम, अटी, निकष, गुण व निवड समित्यांचा तपशील ग्राम विकास व जलसंधारण विभागाच्या 28 सप्टेंबर,2016 रोजीच्या शासननिर्णयामध्ये जाहिर करण्यात आला असून www.maharashtra.gov.in या शासनाच्या संकेतस्थळावरील शासन निर्णय या लिंकवर तो उपलब्ध करुन देण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा माहिती कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी, पुणे यांनी केले आहे.

*****

No comments:

Post a Comment

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...