Friday, February 12, 2021

 



उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक

पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण आराखड्यात १५९.२२ कोटी रुपयांची वाढ

६८० कोटी रुपयांच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण प्रारुप आरखड्यास मंजुरी

ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यावर भर द्या

                                                                     -उपमुख्यमंत्री अजित पवार

            पुणे,दि. १२: जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण आराखड्यात आज १५९.२२ कोटी रुपयांची वाढ करुन पुणे जिल्ह्यासाठी एकूण ६८० कोटी रुपयांच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण प्रारुप आरखड्यास  राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी मंजूरी दिली. जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण प्रारुप आराखड्यासाठी ५२०.७८ कोटी रुपयांची मर्यादा ठरवून देण्यात आली होती, यात वाढ होवून ६८० कोटी रुपयांचा जिल्हा वार्षिक योजनेचा सर्वसाधारण प्रारुप आरखडा आज मंजूर करण्यात आला. जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून दर्जेदार कामे करावीत, असे सांगून ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर द्या, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी केल्या.

            उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज पुणे विभागातील पुणे,सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर या पाचही जिल्ह्यांची सन २०२१-२२ चा सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनांचा प्रारुप आराखडा अंतिम करण्यासाठी राज्यस्तरीय बैठक घेण्यात आली. पुण्यातील विधानभवन सभागृहात झालेल्या पुणे जिल्ह्याच्या बैठकीत जिल्ह्याच्या वार्षिक योजनांच्या प्रारुप आराखड्यावर चर्चा करुन मंजुरी देण्यात आली. यावेळी वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार सर्वश्री मुक्ता टिळक, सुनील शेळके, सुनील टिंगरे, दिलीप मोहिते, अतुल बेनके, अशोक पवार, अतिरिक्त मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, उपायुक्त(नियोजन) राजेश तितर, जिल्हा नियोजन अधिकारी संजय मरकळ तसेच पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, जिल्हा वार्षिक योजनेचा निधी खर्च करुन उत्कृष्ट काम करणाऱ्या प्रत्येक महसूल विभागातील उत्कृष्ट जिल्ह्याला ५० कोटींचा अतिरिक्त निधी "आव्हान निधी" म्हणून देण्यात येईल. यासाठी निकष ठरवण्यात येणार असून त्यात आय-पास प्रणालीचा शंभर टक्के वापर करणे, जिल्हा नियोजन समितीच्या वेळेत बैठका घेणे

, प्रशासकीय मान्यता वेळेत देणे, अखर्चित निधी कमीत कमी ठेवणे, शाश्वत विकास ध्येयांबाबतची प्रगती, नाविन्यपूर्ण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आदी बाबींचा आढावा विभागीय आयुक्त घेतील. यातून उत्कृष्ट जिल्ह्याची निवड करुन या जिल्ह्याला ५० कोटींचा "आव्हान निधी" देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

            उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, जिल्ह्यांच्या विकासासाठी असणारा निधी वेळेत खर्च होणे आवश्यक आहे.  या निधीतून कामे करताना कामांचा दर्जा चांगला ठेवा. कामे गतीने पूर्ण करा. शाळांच्या इमारतींचे बांधकाम, पाझर तलाव बांधकाम, पाणंद रस्त्यांची कामे उत्तम दर्जाची करा.

            ग्रामीण भागातील नागरिकांना त्याच ठिकाणी चांगल्या आरोग्य सुविधा मिळवून देणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयांमध्ये आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचना त्यांनी केल्या.

                विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे म्हणाल्या, जिल्ह्यात अष्टविनायकाची तीर्थक्षेत्रे आहेत. या तीर्थक्षेत्रांच्या मार्गावरील रस्त्यांची कामे होणे आवश्यक आहे. तसेच मुख्य रस्त्यांची कामे करताना स्वछतागृहांचे बांधकाम होणे गरजेचे आहे, यादृष्टीने संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी.

                लोकप्रतिनिधींनी आवश्यक असणाऱ्या विकासकामांबाबत माहिती दिली.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्ह्याची सर्वांगीण माहिती, विविध स्रोतांमधून प्राप्त होणारा निधी व प्रस्तावित असणाऱ्या जिल्हास्तरीय योजनांबाबत सादरीकरण केले.

 

000000000

Wednesday, February 10, 2021

 



जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या हस्ते ई-फेरफार सातबाऱ्याचे वाटप

            पुणे, दि.१०:- महसूल विभागाचे महाराजस्व अभियान हे महत्वाचे अभियान असून याअंतर्गत लोकाभिमुख प्रशासनाच्या संकल्पनेतून  मंडळ स्तरावर दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी फेरफार अदालती घेऊन जनतेच्या प्रलंबित साध्या/वारस/तक्रारी नोंदी निर्गत करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. फेरफार अदालतीत नोंद करण्यात आलेल्या जनतेच्या प्रलंबित तक्रारी निर्गत करुन ई-फेरफार  सातबाऱ्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या हस्ते वाटप करण्यात केले.

              जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी फेरफार अदालतीच्या राजगुरुनगर, खेड आणि मंचर येथील मंडळ अधिकारी कार्यालयास प्रत्यक्ष भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. यावेळी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उप विभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण, सारंग कोडलकर, तहसीलदार वैशाली वाघमारे, रमा जोशी यांच्यासह संबंधित मंडळातील मंडळ अधिकारी, तलाठी, कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते.

             जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, फेरफार अदालतीत जनतेच्या नोंदीत प्रलंबित तक्रारी तातडीने सुनावणी घेऊन निर्गत करा. या माध्यमातून शेतकऱ्यांना सेवा तात्काळ उपलब्ध करुन द्या. कामाचा वेग वाढवून प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी  सूचना दिल्या.

             शासनाची योजना यशस्वी होण्यासाठी नागरीकांचा सहभाग  खूप महत्त्वपूर्ण बाब आहे. त्यामुळे नागरिकांनी फेरफार अदालतीत जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी व्हावे. महसूल विभागाच्या समन्वयाने आपल्या गावातील इतर नागरिकांना याबाबत माहिती देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.

***

Monday, February 8, 2021

 जीवनात चांगला मनुष्य होण्यासाठी योग एक उत्तम मार्ग-राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

 

स्वामी कुवलयानंद योग पुरस्कार २०२० वितरण समारंभ

 

पुणेदि. ८: संपूर्ण जग योगाकडे आकर्षित झाले आहे. मन नियंत्रित करण्यासाठी योगदर्शनशास्त्राची गरज आहे असे सांगून जीवनात चांगला मनुष्य होण्यासाठी योग एक उत्तम मार्ग असल्याचे मत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.

            राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते लोणावळा येथील कैवल्यधाम योगा संस्थेच्यावतीने देण्यात येणारा स्वामी कुवलयानंद योग पुरस्कार २०२० चे वितरण करण्यात आले. अपर पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांना योगाच्या प्रोत्साहन व विकासासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल तर योगाचार्या संध्या दिक्षीत यांना कैवल्यधाम योगा संस्थेतील सेवा व योगाच्या प्रसाराबद्दल सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले.  यावेळी कैवल्यधाम संस्थेचे अध्यक्ष महेशानंदसचिव ओमप्रकाश तिवारी
मुख्य कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुखप्राध्यापक आर.एस. भोगल यांच्यासह संस्थेतील योगा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीविद्यार्थी उपस्थित होते.

         राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणालेमनुष्य जीवनात विचार करत असतांना त्याला कोणत्याही शिक्षणाची गरज नसते. मनुष्य जसा विचार करतो तसे त्याचे मन कार्य करते. त्यामुळे चांगले विचार करा व त्या विचारानुसार कृती करा. जीवनात वाटचाल करतांना जो मार्ग तुम्ही निवडाल तो मार्ग सत्य आहे असे समजून त्यानुसार कर्म करणे आपला अधिकार आहेअसे राज्यपाल श्री कोश्यारी यांनी म्हटले.

            अपर पोलीस महासंचालक डॉ. उपाध्याय म्हणालेयोग ही देशविश्व आणि संस्कृतीची ताकद आहे. योगामुळे शरीरमनचेतनांचा विकास होतो. वैद्यकीय विज्ञान क्षेत्रात योगाला महत्त्वाचे स्थान आहे. योग ही प्राणाची शक्ती आहेअसे डॉ. उपाध्याय यांनी म्हटले. योगाचार्या संध्या दिक्षीत यांनी पुरस्कार प्रदान केल्याबद्दल संस्थेचे आभार मानले.

              राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी संस्थेतील दार्शनिक साहित्य संशोधन विभागाच्या ग्रंथालयाची पाहणी करुन विभाग प्रमुख डॉ. राजेश्वर मुखर्जी यांच्याकडून ग्रंथालयाबाबत माहिती जाणून घेतली. त्यानंतर संस्थेतील परिसराची पाहणी केली तसेच स्वामी कुवलयानंद यांच्या समाधीचे दर्शन घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल त्रिवेदी यांनी केले तर आभार सुबोध तिवारी यांनी मानले.

*****













Friday, January 29, 2021

 शिवजयंती उत्सव साधेपणाने साजरा करा

                     --जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

 

         पुणे,  दि. 29 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवभक्तांनी गर्दी टाळून यंदाचा शिवजयंती उत्सव साधेपणाने परंतु उत्साहात साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.

            शिवनेरीवरील शिवजयंती उत्सवासंदर्भात जुन्नर नगरपालिकेकडून तसेच विविध विभागांकडून करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी घेतला. त्यावेळी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार अतुल बेनके, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे उपस्थित होते.

            कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. सर्व शिवभक्तांनी थर्मल स्कॅनिंग करावे, तसेच सॅनिटायझर, मास्क, सोशल डिस्टन्सिंग आदी नियमांचे पालन करुन उत्सव साजरा करावा व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी केले. नगरपरिषद, बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, वनविभाग, पुरातत्त्व विभागाने केलेल्या तयारीचा आढावा त्यांनी घेतला. विद्युत व्यवस्था, गडावर करण्यात येणारी रोषणाई, स्वच्छतागृहांची सुविधा, अग्निशमन दल, पोलीस बंदोबस्त, वाहतूक व्यवस्था, हेलीपॅडची व्यवस्था इत्यादी बाबत आढावा बैठकीत घेण्यात आला.

            दरवर्षी महाराष्ट्रातून तसेच महाराष्ट्राबाहेरुन शिवभक्त शिवज्योत घेऊन येतात. त्यामुळे गडावर मोठया प्रमाणावर गर्दी होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी शिवज्योत घेऊन जाणा-या भक्तास बनकर फाटा, आळेफाटा आदी ठिकाणी शिवज्योत उपलब्ध करुन दिल्यास एकाच वेळी एकाच ठिकाणी गडावर होणारी गर्दी टाळता येईल, असे मत पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी मांडले.

            सर्व विभागाच्या प्रमुखांनी प्रत्यक्ष शिवनेरीवर जाऊन शिवजयंतीपूर्वी पाहणी करावी, असे आवाहन आमदार अतुल बेनके यांनी केले.

            यावेळी विविध विभागांचे अधिकारी, शिवप्रेमी उपस्थित होते.

00000








 

 

उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मौजे कोंढवा खुर्द येथील विविध विकास कामांची आढावा बैठक

पुणे, दि. 29:- उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मौजे कोंढवा खुर्द सर्वे नं. ५ येथील नियोजित ३६ मीटर व २४ मीटर रस्त्यासाठी जागा ताब्यात घेवून रस्ता रुंदीकरणाच्या कामासंदर्भात, कोंढवा खुर्द येथील नियोजित कुमार पृथ्वी ते शिवनेरीनगर डी.पी. रस्त्याबाबत, क्रीडांगण आरक्षण तसेच पश्चिम महाराष्ट्रातील मुस्लिम समाजासाठी कोंढवा, पुणे येथे हज हाऊस उभारण्याबाबतव्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे बैठक पार पडली. 

          यावेळी आमदार चेतन तुपे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थितीत होते
                                                                                       000





 

क्रीडा धोरणाला चालना देण्यासाठी
क्रीडा संकुलाचे काम दर्जेदार करा

- उपमुख्यमंत्री अजित पवार

 

पुणे, दि.29 :  महाराष्ट्र स्पोर्टस इंन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलेपमेंट प्लॅन अंतर्गत राज्यात क्रीडा सुविधा निर्माण करण्यात येत आहे. क्रीडा धोरणाला चालना देण्यासाठी क्रीडा संकुलाचे काम दर्जेदार करा असे, निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

             उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय क्रीडा संकुल, येरवडा व जिल्हा क्रीडा संकुल, बारामती येथील विविध कामांचा आढावा घेण्यासाठी विभागीय व जिल्हा क्रीडा संकुल समितीची आढावा बैठक व्ही.व्ही. आय.पी. सर्कीट हाऊस येथे आयोजित करण्यात आली होती.  त्यावेळी ते बोलत होते. यावेळी  जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, पोलीस उपायुक्त मितेश घट्टे, प्रातांधिकारी दादासाहेब कांबळे, क्रीडा व युवक सेवा उपसंचालक तथा सदस्य सचिव विजय संतान, माहिती उपसंचालक राजेंद्र सरग, बारामतीचे मुख्‍याधिकारी किरण यादव यांच्यासह  संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थितीत होते.

               बैठकीत प्रारंभी मागील बैठकीचे इतिवृत्त कायम करण्याबाबत चर्चा केली. त्यांनतर आमंत्रित सदस्य निश्चित करणे. क्रीडा संकुलाच्या जमाखर्चाचा आणि क्रीडा संकुल येथील सुविधांचा आढावा घेणे, क्रीडा संकुल येथील प्रस्तावित करण्यात आलेल्या सुविधा तसेच क्रीडा संकुलाकरीता वास्तुशास्त्रज्ञ यांच्या नियुक्ती करणे. युवा वसतिगृहाची स्थापना करणे.  क्रीडा संकुलाकरीता उर्वरीत रकमेची मागणी करण्यापुर्वी उपलब्ध जागेचा आढावा घेणे. बॅडमिंटन हॉल व जलतरण तलाव येथील प्रेक्षक गॅलरीमध्ये पायऱ्यांवर खुर्च्या बसविणे. अर्बन इन्फाकॉम या संस्थेचे कोरोना कालावधीतील भाडे शुल्क कमी करणे. प्रा. शिवाजी साळुंके यांनी सादर केलेला प्रस्ताव. योग अॅकेडमी करीता हॉल भाडे तत्वावर देण्याबाबत चर्चा करण्यात आली.

          मागील बैठकीचे इतिवृत्त व बैठकीचे प्रास्ताविक क्रीडा व युवक सेवा उपसंचालक तथा सदस्य सचिव विजय संतान यांनी सादर केले.

*****







 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत

गृह प्रकल्प योजनेची केली पाहणी

 

पुणे, दि.29 :  उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या भोसरी येथील सेक्टर क्रमांक १२ येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिक दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटातील गृह प्रकल्प योजनेच्या कामांची आज पाहणी केली.

             उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गृह प्रकल्पाचे काम लवकरात पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना दिले. त्याचबरोबर भुखंडाचे एकूण क्षेत्रफळ, सदनिकेचे चटई क्षेत्र, एकूण सदनिका, गृहप्रकल्पातील एकूण व्यापारी गाळे, प्रकल्प उभारणीकरीता लागणारा खर्च, सदनिकेची विक्री किमंत तसेच रंगरंगोटी, क्रीडांगण, पार्किंग, उद्वाहिका, सोलर पॅनलची व्यवस्था, पाण्याचे नियोजन, ओला व सुका कचऱ्याचे व्यवस्थापन, क्लब हाऊस, रेन वॉटर हार्वेस्टिंग, स्वच्छतागृह, फर्निचर, अग्निशामक यंत्रणा, अग्निप्रतिबंधक दरवाजा, मैला सांडपाण्याचे वाहिन्या, वाहतूक आदि पायाभूत सोई सुविधांची माहिती जाणून घेतली. गृह प्रकल्पाची माहिती क्रिएशन्स् इंजिनिअर्स प्रा. लि.चे  रमाकांत भुतडा यांनी दिली.

         यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बन्सी गवळी, कार्यकारी अभियंता प्रभाकर वसईकर, पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या माजी महापौर मंगला कदम, संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

******






Wednesday, January 27, 2021

 

जिल्हा प्रशासनाच्यावतीने कॅमेरामन मोरे आणि खंडागळे यांचा गौरव

 

           पुणे दि. 28 :-भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा प्रशासनाच्यावतीने लोकसभा व विधानसभा निवडणुकीत चित्रीकरण व छायाचित्रण या क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल पुणे विभागीय माहिती कार्यालयातील कॅमेरामन संतोष मोरे व चंद्रकांत खंडागळे यांचा अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी गौरव केला. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत, पुणे कॅन्टोनमेंट मतदार संघाच्या उपजिल्हाधिकारी स्नेहल भोसले, भोसरी विधानसभा मतदार संघाच्या उपजिल्हाधिकारी राणी ताटे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

***

 

Friday, January 22, 2021

 


सिरमची कोरोना लस सुरक्षित, लस उत्पादनाला फटका नाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्र्यांकडून सिरम इन्स्ट्यिट्यूटला लागलेल्या आगीची  पाहणी

आग प्रकरणाच्या चौकशी अहवालानंतर कारण स्पष्ट होईल

 

            पुणे,दि. 22: सिरमची कोरोना लस सुरक्षित आहे. कोव्हीशिल्ड लस उत्पादनाला फटका नाही. आग प्रकरणाची चौकशी सुरू असून चौकशी  अहवाल प्राप्त झाल्यानंतर आगीचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले.

            सिरम इन्स्ट्यिट्यूटला लागलेल्या आगीची  पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. दुर्घटनेबाबतची सविस्तर माहिती त्यांनी घेतली. तसेच सिरम इन्स्ट्यिट्यूटच्या टिमशी त्यांनी संवाद साधला.

 विधान परिषदेच्या उपसभापती निलम गो-हे,कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील

, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खा. गिरीश बापट, आ. चेतन तुपे,  सिरमचे अदर पुनावाला,  विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, मुख्यमंत्री यांचे प्रमुख सल्लागार अजोय मेहता, आरोग्य सल्लागार डॉ.दीपक म्हैसेकर, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यावेळी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री म्हणाले, संपूर्ण जगात कोविडचा हैदोस अद्यापही संपलेला नाही, गेल्या आठवडयात सिरमच्या लसीमुळे आशेचा किरण निर्माण झाला. लस बनवणाऱ्या केंद्रात आग लागली ही बातमी आली, दुदैवाने या दुर्घटनेत पाच कामगार मृत्यूमुखी पडले. लस बनवली जाते ते केंद्र साठा संपूर्णपणे सुरक्षित आहे. काल आगीचे वृत्त समजताच तातडीने संपर्क करून याबाबतची माहिती घेतली. ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली त्या इमारतीमधील पहिले दोन मजले वापरात आहेत, वरील दोन मजले जिथे नवे केंद्र सुरू केले जाणार होते, त्या ठिकाणी ही दुर्घटना घडली. लस उत्पादन केंद्रालाच आग लागली तर पुढे कसे होणार अशी सर्वांनाच भीती होती. मात्र कोविडची लस जिथे बनवली जाते, ते केंद्र अंतरावर आहे, सिरमची कोरोना लस सुरक्षित आहे. कोव्हीशिल्ड लस उत्पादनाला फटका नाही. आग प्रकरणाची चौकशी सुरू असून चौकशी पूर्ण होवून अहवाल प्राप्त झाल्यानंतर आगीचे नेमके कारण स्पष्ट होईल. मृत्यू झालेल्या कुटुंबाची जबाबदारी सिरम कंपनीने घेतली आहे. त्याशिवाय काही आवश्यकता असेल तर शासन निश्चित करेल, असे त्यांनी सांगितले.

            सिरमचे अदर पुनावाला म्हणाले, कोरोना लसीच्या पुरवठयावर कोणताही परिणाम नाही. बीसीजी आणि इतर लसीचे नुकसान झाले आहे. कोव्हिशिल्ड लसीचा पुरवठा सुरळीत असून लसीवर परिणाम नाही, मात्र आर्थिक नुकसान मोठे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

0000

Tuesday, January 19, 2021

                                    प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य

महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ

आधुनिकीकरणाकडे वाटचाल करताना मातृभूमी, मातृभाषा,सदाचार आणि संस्कृतीला विसरु नका

                                                                -राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

 

            पुणे,दि.१९:  आधुनिकीकरणाकडे वाटचाल करताना आपली मातृभूमी, मातृभाषा, सदाचार आणि आपल्या संस्कृतीला विसरु नका, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले.

            प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी बोलत होते. यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. नितीन करमळकर, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एकबोटे, संस्थेचे कार्यवाह प्रा. शामकांत देशमुख, सहकार्यवाह प्रा. ज्योत्स्ना एकबोटे, प्रा.सुरेश तोडकर, प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव तसेच शिक्षण व अन्य विभागातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी सेंट्रल सॉफीस्टीकेटेड ऍनालेटिकल इन्स्ट्रुमेंटेशन फॅसिलिटी आणि प्रिन्सिपल व्हर्च्युअल केबीनचे डिजिटल स्वरुपात अनावरण व सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विशेषांकाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच प्रा.डॉ. गजानन एकबोटे व प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव यांना राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

            राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले,  आपण सर्वजण आधुनिकीकरणाचा ध्यास घेऊन वाटचाल करत आहोत. परंतु, केवळ आधुनिक बनण्यापेक्षा आदर्श बनण्यासाठी झटणे आवश्यक आहे. सदाचार ही जीवनातील महत्वपूर्ण बाब आहे. सदाचारी व्यक्तीचा सदैव गौरव केला जातो, यासाठी सदाचारी बना. परकीय देशांच्या भाषेचे ज्ञान घेताना मातृभाषेकडे दुर्लक्ष करु नका. आपल्या मातृभूमीचा व मातृभाषेचा सदैव अभिमान बाळगा, असे त्यांनी सांगितले.

            नाविन्यपूर्ण बाबींचे अधिकाधिक ज्ञान ग्रहण करुन विद्यार्थ्यांनी विद्वान बनावे,असे सांगून राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, 'भारत' हा प्राचीन काळापासून अनेक गोष्टींमध्ये अग्रेसर देश म्हणून ओळखला जातो, भविष्यात देखील आपला देश विविध बाबींमध्ये अग्रेसर ठरण्यासाठी आपल्या ज्ञानाचा देशहितासाठी उपयोग करा आणि जगभरात चांगले नाव कमवा, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. नव्या शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी प्रयत्न करावेत, असे सांगून प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये आजवर अनेक विद्यार्थ्यांनी नावलौकिक मिळवल्याबद्दल विद्यार्थ्यांचे व संस्थेचे कौतुक केले.

            सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर म्हणाले, विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन देऊन त्यांना दर्जेदार शिक्षण देणे तसेच त्यांना आपल्या शैक्षणिक संस्थेत टिकवून ठेवणे हे आव्हान असते. विद्यार्थी हिताचे नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम तयार करुन त्यांना स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभे करणे महत्वाचे असते. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संस्थेत विविध चांगल्या संकल्पना व शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्याचे दिसून येते, असे त्यांनी सांगितले.

            कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एकबोटे म्हणाले, दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न महाविद्यालयाने नेहमीच भर दिला आहे. भविष्यात या संस्थेचा आणखी विस्तार करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

            प्रास्ताविक संस्थेच्या सहकार्यवाह प्रा. ज्योत्स्ना एकबोटे यांनी केले. संस्थेच्या वाटचालीबाबत प्रा. डॉ. अंजली सरदेसाई यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. आभार प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव यांनी मानले. सूत्रसंचालन कार्यवाह प्रा. शामकांत देशमुख यांनी केले.

 

00000







                                       बारामती कृषी विज्ञान केंद्रामध्ये ‘कृषी तंत्रज्ञान सप्ताहास सुरुवात

उपलब्ध बाजारपेठेनुसार पिके घेऊन शेतीला चांगला दर्जा मिळवून देऊया

-ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार

 

            उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दादाजी भुसे, मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री विश्वजित कदम यांची उपस्थिती

 

            पुणे,दि.१८:  उपलब्ध बाजारपेठेचा फायदा शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, असे सांगून उपलब्ध बाजारपेठेनुसार पिके घेऊन शेतीला चांगला दर्जा मिळवून देऊया, असे आवाहन ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केले.

            बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये दि.18 ते 24 जानेवारी 2021 या कालावधीत "कृषिक" या कृषि तंत्रज्ञान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या कृषि तंत्रज्ञान  सप्ताहास आज ज्येष्ठ नेते तथा खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार  व अन्य मंत्री महोदयांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. यावेळी कृषिमंत्री दादाजी भुसे, मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, भारतीय अनुसंधान परिषदेचे महासंचालक त्रिलोचन मोहपात्रा(ऑनलाईन), राज्याचे कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरजकुमार, उपसंचालक सुरेश चौधरी, ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट चे अध्यक्ष राजेंद्र पवार व सुनंदा पवार, बायर कंपनीचे डॉ. सुभाष जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट व सॉलिडारिडार, आशिया या संस्थांमध्ये करण्यात आलेल्या कराराच्या (एमओयु) प्रतीचे हस्तांतरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट या संस्थेच्या 50 वर्षातील वाटचालीविषयी बनविण्यात आलेल्या चित्रफितीचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

            खासदार शरद पवार म्हणाले, गहू, तांदळाच्या बाबतीत आपला देश स्वयंपूर्ण झाला आहे. बाजारपेठेनुसार शेती पिके घेतल्यास उत्पादनाला चांगला भाव मिळतो. यासाठी बाजारपेठेच्या मागणीनुसार विविध डाळी व फळपिकांचे उत्पादन देखील शेतकऱ्यांनी घ्यायला हवे.  शेतीसाठी 'पाणी' हा घटक महत्वाचा आहे. शेतीसाठी किती प्रमाणात आणि कशाप्रकारे पाण्याचा वापर करायचा याची माहिती शेतकऱ्यांना होणे आवश्यक असते. यादृष्टीने दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांवर 'कृषिक' सप्ताहाच्या माध्यमातून माहिती देण्यात आली, असे सांगून खासदार शरद पवार म्हणाले, ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विस्ताराचे काम दिवंगत आप्पासाहेब पवार यांनी केले, तर संस्थेत आधुनिकता आणण्यासाठी राजेंद्र पवार यांनी परिश्रम घेतले. संस्थेला 50 वर्षे पूर्ण होत असून  संस्थेच्या वाटचालीसाठी अनेक मान्यवरांचे सहकार्य मिळाल्याचेही खासदार श्री. पवार यांनी आवर्जून सांगितले.

 

शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद फुलविण्यासाठी राज्याचा कृषी विभाग प्रयत्नशील

-कृषी मंत्री दादाजी भुसे

              कृषी मंत्री दादाजी भुसे म्हणाले, बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राद्वारे शेतकऱ्यांना शेतीविषयक नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती करुन दिली जात आहे. याच पद्धतीने राज्यातील अन्य भागातील शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती उत्पादन व शेती तंत्रज्ञानाची माहिती करुन देण्यासाठी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये 'कृषी तंत्रज्ञान सप्ताह' सुरु होण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून प्रयत्नशील आहे. शेतकरी बांधवांच्या जीवनात आनंद फुलविण्यासाठी राज्याच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी अनेक महत्वपूर्ण योजना राबवण्यात येत आहेत. माती परीक्षण करुन त्या- त्या भागातील माती नुसार शेतीमध्ये खते वापरण्याबाबतचे फलक लावण्यात येत आहेत. यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास निश्चितच मदत होईल. महाडीबीटी पोर्टलवर एकाच अर्जाद्वारे कृषी विभागाच्या अनेक योजनांचा लाभ मिळवून देण्यात येत आहे, असे सांगून कृषी मंत्री दादाजी भुसे म्हणाले, शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्याच्या दृष्टीने "विकेल ते पिकेल" ही संकल्पना राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकून घेऊन ते गतीने सोडवण्यासाठी विविध कक्ष स्थापन करण्यात येत आहेत.

 कृषी मंत्री श्री. भुसे म्हणाले, शेतकऱ्यांबरोबरच राज्यातील शेतमजुरांना विविध कौशल्यांची माहिती देऊन कौशल्यावर आधारीत कुशल शेतमजुर बनवण्यासाठी कृषी विभागाच्यावतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. कृषी विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांची माहिती त्यांनी यावेळी दिली.

            कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी सुरुवातीला कृषी विज्ञान केंद्राला भेट देवून शेतीविषयक विविध औजारे, तंत्रज्ञान व शेती उत्पादनांच्या प्रदर्शनाला भेट देऊन पाहणी केली. यानंतर डेअरी प्रकल्प केंद्राला भेट देऊन येथील विविध सोयी-सुविधांची पाहणी केली. यानंतर माळेगाव खुर्द येथील राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेला (एनआयएएसएम) भेट देऊन पाहणी केली. यावेळी खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व अन्य मान्यवरांनी नियोजित सायन्स पार्कला भेट देऊन विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रात्याक्षिकांची पाहणी करुन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

 

दुष्काळ निवारण यंत्रणेचा आढावा

            राज्यात दुष्काळ निवारणाच्यादृष्टीने आवश्यक उपाययोजनांबाबत कार्यक्रमात तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. दुष्काळ निवारण यंत्रणेचा आढावा, भारतीय कृषी संशोधन परिषदेची दुष्काळ निवारण यंत्रणेशी प्रतिबद्धता, दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी भात, ऊस पिकांसाठी पाणी वाचवण्याच्या दृष्टीने लागवड तपासणी, दुष्काळ सूचक यंत्रणा, पुणे जिल्ह्यासाठी मृदा सर्वेक्षण व भूमी वापर नियोजन आदी विषयांवर  डॉ. सुहास जोशी, डॉ. हिमांशू पाठक, डॉ. सचिन नांदगुडे, डॉ. सुनील गोरांटीवार, डॉ. विवेक भोईटे, सारंग नेरकर, डॉ. बीएस द्विवेदी आदी तज्ञ मान्यवरांनी सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन केले.

 

"कृषिक" कृषी तंत्रज्ञान सप्ताहाला सुरुवात

            राष्ट्रीय अजैविक स्ट्रेस प्रबंधक संस्था, अग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि बायर कंपनी यांच्या प्रयत्नातून हा कृषि तंत्रज्ञान सप्ताह  पार पडत आहे. दरवर्षीच्या कृषिक  प्रदर्शनातील प्रक्षेत्र भेटीसह  फूड प्रोसेसिंग, डेअरी टेक्नॉलॉजी, प्रक्रिया उद्योग, मार्केटिंग ब्रँडिंग आदी तंत्रज्ञानाचा यात समावेश आहे. याशिवाय वैशिष्ट्यपूर्ण  खाद्य पदार्थांच्या प्रक्रिया उद्योगांचे लाईव्ह डेमो पाहता येत आहेत. याठिकाणी कृषी तंत्रज्ञानासह  शेतीविषयक विविध प्रयोगांचा समावेश आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क, सॅनिटायझर आदी खबरदारी घेऊन याठिकाणी शेतकऱ्यांना प्रवेश देण्यात येत आहे.

0000000








  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची राज्यस्तरीय बैठक पुणे जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व...